Marathi Story | Marathi Goshti | Marathi Katha-मराठी कथा |

The Marathi story is also known as Marathi katha or Marathi Goshti, which has a wide range of themes, usually including moral stories, inspirational stories, love stories, and life stories.मराठी कथा वाक്കलेखन करणारे लेखकांचे नाम उलगडणारा आणि वाक്കलेखन करणारे लेखकांचे पाठयारी नाही तर वाक്കलेखन करणारे लेखकांचे विचार नाही आणि पाठयारी नाही तर उलगडणारा लेखकांचे नाम आणि वाक്കलेखन करणारे लेखकांचे पाठयारी नाही तर वाक്കलेखन करणारे लेखकांचे विचार आणि पाठयारी नाही तर उलगडणारा लेखकांचे नाम आणि वाक്കलेखन करणारे लेखकांचे पाठयारी नाही तर वाक്കलेखन करणारे लेखकांचे विचार आणि पाठ...

  • Experience the Richness of Marathi Culture through Stories | Marathi Goshti | Marathi Katha |

    Experience the Richness of Marathi Culture through Stories

    Marathi Story-Marathi Goshti-Marathi Katha-मराठी कथा अथवा मराठी गोष्टी या मराठी कथा को विशेषत: मराठी कथा या मराठी गोष्टी, जिनका विषय बहुत विस्तृत है, आमतौर नैतिक कथा, प्रेरणादायक कथा, प्रेम कथा और जीवन कथा सहित है । यह लोगों को और महत्वाकांक्षा को और उत्साहित कर सकता है, और छात्रों को अधिक मेहनत करने के लिए प्रोत्साहित कर सकता है । माताओं को अपने बच्चों को सोचते हुए मराठी कथा कहते हैं, ताकि वे छोटी सी उम्र में मराठी संस्कृति का शिक्षण प्राप्त कर सकें।

    The Marathi story is also known as Marathi katha or Marathi Goshti, which has a wide range of themes, usually including moral stories, inspirational stories, love stories, and life stories. It can inspire people to live more positively and encourage students to study harder. Mothers usually tell Marathi stories to their children before bedtime to give them a cultural education in Marathi from a young age.

    Marathi Story One * डॉ. शिल्पा जैन सुराणा

    ‘‘शिवानी, माझे शर्ट कुठेय?’’ पुनीतने मोठयाने हाक मारत विचारले.

    ‘‘अरे तू पण ना…? हे काय, इथेच तर आहे… पलंगावर.’’ शिवानी खोलीत येत म्हणाली.

    ‘‘शर्ट तर फक्त बहाणा होता. तू इकडे ये ना. संपूर्ण दिवस काम करत असतेस.’’

    शिवानीला आपल्या मिठीत ओढत पुनीत खटयाळपणे म्हणाला.

    ‘‘सोड ना, काय करतोस…? खुप कामं आहेत मला.’’ लटक्या रागात शिवानी म्हणाली.

    ‘‘अगं वहिनी…  सॉरी… सॉरी… चालूदे तुमचे… मी जाते.’’ दरवाजा उघडा असल्यामुळे पावनी सरळ आत आली होती. तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले.

    ‘‘अगं नाही, असे काहीच नाही. काही काम होते का पावनी?’’ शिवानीने आपल्या नणंदेला विचारले.

    ‘‘वहिनी, नवी कामवाली आली आहे. आई बोलावतेय तुला.’’ पावनीने सांगितले.

    Marathi Story One * डॉ. शिल्पा जैन सुराणा

    शिवानी या घरची सून नाही तर या घराचा आत्मा आहे. ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत घराशी एकरूप झाली. शिवानी आणि पुनीतच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली. शिवानीच्या सासू-सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पावनीलाही ती नणंद न मानता छोटया बहिणीप्रमाणे वागवते.

    लग्नानंतर काहीच दिवसांनी शिवानीच्या सासूबाईंना पॅरालिसेस म्हणजे पक्षघाताचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर अधू झाले. मात्र शिवानीने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली. ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती. सासूबाईही तिला आपली मुलगी मानायच्या. सासऱ्यांना मधुमेह होता. शिवानी त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली, असा एकही दिवस गेला नव्हता. शिवानी या घराशी एकरूप झाली होती.

    ‘‘आई, उद्या शाळेत विज्ञानाचा प्रकल्प द्यायचाय. शिक्षकांनी सांगितले की, उद्या सर्वांना प्रकल्प पूर्ण करून द्यावाच लागेल.’’ विभोरने सांगितले.

    ‘‘अरे बापरे… पुन्हा प्रकल्प…? शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना, हेच समजत नाही. कधी हा प्रकल्प तर कधी तो…’’ शिवानी वैतागली होती.

    ‘‘शिवानी, तुझा फोन आलाय,’’ सासूने आवाज दिला.

    ‘‘आले आई,’’ शिवानी म्हणाली.

    ‘‘बाळा, तू कपडे बदल, मी लगेच येते,’’ शिवानीने विभोरचा गाल थापटत सांगितले.

    ‘‘हॅलो शिवानी, मी ज्योती. पुढच्या आठवडयात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र भेटणार आहेत. तू येशील ना…? खूप मजा येईल. आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ. किती मजा केली होती आपण… तू यायला नकार देऊ नकोस,’’ ज्योतीने सांगितले.

    ‘‘एकत्र भेटायचे… माझ्यासाठी शक्य नाही ज्योती… घरात खूप काम आहे. वेळ असतोच कुठे?’’ शिवानी म्हणाली.

    शिवानी, तू खरंच बदलली आहेस… तुझ्याकडे कधीच वेळ नसतो. कुठे गेली आमची ती रॉकस्टार? आम्ही ठरवले होते की, बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच गाणे पुन्हा ऐकायचे…

    श्रेया अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही… चल, यायचा प्रयत्न कर,’’ असे म्हणत ज्योतीने फोन ठेवला.

    ‘‘सर्वांनी एकत्र भेटायचे?’’ ती स्वत:शीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली. रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वत:च्या खोलीत आली. कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले. अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बमकडे गेली.

    ‘‘आई, झोप येतेय, चल ना…’’ तिची ओढणी पकडत विभोर म्हणाला. शिवानीने अल्बम बाजूला ठेवला आणि विभोरला झोपवू लागली. तो झोपल्यावर ती अल्बम पाहू लागली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची. कितीतरी मुलांना ती आवडायची, पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही.

    संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती.  त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिली आणि ती रॉकस्टार झाली. महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असो, ती नेहमीच प्रथम क्रमांक पटकवायची… ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली. शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती…

    ‘‘उद्या असू ना असू आपण,

    क्षण आठवतील हे क्षणोक्षण,

    क्षण हे आहेत प्रेमाचे क्षण,

    चल ये माझ्यासोबत चल,

    चल… कसला विचार… छोटेसे आहे जीवन.’’

    त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण मनापासून जगत होती.

    ‘‘काय झाले? आज झोपायचे नाही का? घडयाळाकडे बघ. रात्रीचे ११ वाजलेत.’’ पुनीत म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणांमधून अचानक बाहेर आली.

    ‘‘हो,’’ शिवानीने सांगितले आणि कपडे बदलायला गेली.

    दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला. विभोरला अंघोळ घालून शाळेत पाठवले. कामवाली यायची वेळ झाली होती. तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली. सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. घडयाळात बघितले तर १० वाजले होते. पुनीत ११ वाजता कामाला जाईल. त्याचा डबा बनवणे बाकी होते. सकाळच्या वेळेस शिवानी एखाद्या रोबोसारखीच असते… ११ वाजले. बहुतेक आजही कामवाली येणार नाही, असा विचार करत शिवानीने डबा तयार केला. काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली. काल रात्री तिने तो अल्बम टेबलावरच ठेवला होता. तिने तो उघडला. त्यानंतर स्वत:ला आरशात बघितले.

    ‘‘कुठे गेली ती शिवानी?’’ स्वत:ला आरशात बघत शिवानी विचार करू लागली. पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांनी शिवानीचे लग्न करायचे ठरवले. त्यातच पुनीतचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला. या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली, हे शिवानीला समजलेच नाही.

    तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात. तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होती, हे तिला आता आठवतही नाही. या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की, तिने गुणगुणनेही सोडून दिले होते.

    ‘‘शिवानी,’’ पुनीतने आवाज दिला. ती धावतच खाली गेली.

    ‘‘शिवानी, कामावर जायची वेळ झालीय… माझा डबा कुठे आहे?’’ पुनीतने विचारले.

    ती स्वयंपाकघरात गेली आणि डबा आणून पुनीतच्या हातात दिला.

    ‘‘वहिनी, आज मी सिनेमा बघायला जाणार आहे. कदाचित यायला उशीर होईल. तू सर्व बघून घेशील ना?’’ पावनीने शिवानीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले.

    ‘‘हो, पण खूप उशीर करू नकोस,’’ शिवानी म्हणाली.

    ‘‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, लाडक्या वहिनी,’’ असे म्हणत तिने शिवानीचे गाल प्रेमाने ओढले. शिवानीने स्मितहास्य केले

    आणि ती पुन्हा कामाला लागली… पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते.

    ‘‘शिवानी, शिवानी, बाळा बघ… दूध उतू जातेय,’’ सासूबाईंनी सांगितले.

    ‘‘हो, आई,’’ शिवानी म्हणाली.

    विभोर शाळेतून आला. तो नाराज होता. शिवानीने विचारताच रडू लागला.

    ‘‘आई, तू वाईट आहेस. काल मी तुला विज्ञानाचा प्रकल्प बनवून द्यायला सांगितले होते. तू बनवून दिला नाहीस. शिक्षक ओरडले.’’ शिवानीला आठवले की, विभोरने तिला सांगितले होते, पण तीच विसरून गेली. विभोर खूपच उदास झाला होता.

    रात्रीचे ८ वाजले होते. पुनीत यायची वेळ झाली होती. शिवानीने जेवण वाढायला घेतले. तितक्यात पुनीत आला.

    ‘‘चला, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे,’’ शिवानीने पुनीतला सांगितले.

    तितक्यात पावनीही आली.

    ‘‘इतका उशीर का झाला पावनी?’’ सासूबाईंनी विचारले.

    ‘‘ते… म्हणजे काम होते माझे. वहिनीला सांगून गेले होते.’’ पावनीने सांगितले.

    ‘‘शिवानी, तू सांगितले नाहीस,’’ सासूबाईंनी विचारले.

    ‘‘मी विसरले,’’ शिवानी म्हणाली.

    ‘‘शिवानी, तू जरा जास्तच विसरभोळी झाली आहेस. आज तू मला रिकामा डबा दिला होतास.’’ पुनीतने सांगितले.

    ‘‘बाबा, माझा प्रकल्प बनवून द्यायलाही आई विसरली… शिक्षक ओरडले मला.’’ विभोरने तोंड वेडेवाकडे करत सांगितले.

    शिवानीच्या डोळयात अश्रू जमा झाले. ती रडू लागली. तिचे रडणे सर्वांसाठीच अनपेक्षित होते.

    ‘‘अरे पुनीत, चुकून झाले असेल… आणि विभोर, तू खेळात मग्न झाला असशील. पुम्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला?’’ शिवानीच्या सासूबाई म्हणाल्या.

    ‘‘नाही आई, कोणाचीच काही चूक नाही. चूक माझी आहे. कदाचित मीच एक चांगली सून नाही, चांगली आई नाही, मी प्रयत्न करतेय, पण मला जमत नाही… मला माफ करा…

    माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही,’’ हुंदके देत शिवानी म्हणाली.

    ‘‘नाही बाळा, तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस,’’  सासूबाईंनी सांगितले, पण काही केल्या शिवानीचे रडणे थांबत नव्हते.

    ‘‘पुनीत, शिवानीला तुमच्या खोलीत घेऊन जा,’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

    शिवानीला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले. कोणालाच शिवानीबद्दल काहीच तक्रार नव्हती. अचानक शिवानीला काय झालेय, हाच प्रश्न सर्वांना सतावत होता.

    ३ दिवसांनंतर शिवानीचा वाढदिवस होता. सर्वजण एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले की, शिवानीला नेमके काय झाले असावे? त्यानंतर सर्वांनी ठरवले की, तिचा हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील, असा साजरा करायचा.

    ‘‘पावनी काय करतेस तू?’’ शिवानीने विचारले.

    ‘‘वहिनी, तू फक्त डोळे उघडू नकोस,’’ पावनीने तिच्या हातांनी शिवानीचे डोळे बंद केले होते.

    डोळे उघडताच शिवानीने पाहिले की, तिच्या आवडीच्या पिवळया गुलाबांनी घर सजले होते. समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता. सर्व शिवानीकडे बघत होते.

    ‘‘शिवानी बाळा, हे तुझ्यासाठी,’’ तिच्या सासऱ्यांनी पलंगाकडे बघत सांगितले.

    तिथे एक मोठा खोका होता.

    ‘‘आई, बघ तर खरं, काय आहे त्या खोक्यात…’’ विभोर आनंदाने म्हणाला.

    शिवानीने तो खोका उघडला आणि तिच्या डोळयातून अश्रू ओघळू लागले.

    ती तिच्यासाठी नवीन गिटार होती.

    ‘‘शिवानी, जेव्हापासून तू या घरत आलीस, सर्व घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतलीस… पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो. तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस… पण त्या जुन्या शिवानीला विसरलीस. घर-संसार, जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा… पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, तू काही वेळ स्वत:साठीही राखून ठेवावा.

    ‘‘आजपासून आम्हाला आमची जुनी शिवानी परत हवीय. जिच्या गाण्यांनी या घराला नवी ऊर्जा मिळायची. तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’’ शिवानीच्या  सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले.

    ‘‘सूनबाई, आजपासून विभोरला बस स्थानकावर सोडून यायची जबाबदारी माझी. येताना मी किराणा सामान घेऊन येईन. याच निमित्ताने माझे थोडे चालणेही होईल.’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

    ‘‘वहिनी, आजपासून मी दररोज १ तास विभोरला शिकवित जाईन,’’ पावनी म्हणाली.

    ‘‘आणि हो, सूनबाई… स्वयंपाकघरातील छोटी-मोठी कामं मी करेन. तू मला नुसते बसवून ठेवलेस तर मी उगाचच आजारी पडेन,’’ शिवानीच्या सासूबाईंनी स्मितहास्य करत सांगितले.

    ‘‘आजपासून घरातल्या सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिल भरण्याचे काम माझे असेल. चल, आता रडणे बंद कर. २ दिवसांनंतर महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना…? तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का…? आणि हो, तिथे आमच्या रॉकस्टार शिवानीला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना…? तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा… आता आपल्यासमोर येत आहे आपली रॉकस्टार शिवानी,’’ पुनीत हळूच तिला डोळा मारत म्हणाला.

    शिवानीच्या डोळयातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आता शिवानी गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एका सुरात गात होते.

    ‘‘एकमेकांवर खूप प्रेम करतो आम्ही…’’

    Marathi Story Two * आरती प्रियदर्शिनी

    ‘‘निम्मो, संध्याकाळचे दिवे लावण्याची तयारी करून ठेव. लक्षात आहे ना, आज ५ एप्रिल आहे.’’ आत्येने आईला आठवण करून देत सांगितले.

    ‘‘अगं ताई, तयारी काय करायची? बाल्कनीत फक्त एक दिवा तर लावायचा आहे. शिवाय जर दिवा नसला तर मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाईट किंवा बॅटरी लावू.’’

    ‘‘अरे, तू गप्प बस.’’ असे म्हणत आत्येने वडिलांना गप्प केले.

    ‘‘मोदीजींनी दिवे लावा, असे उगाचच सांगितलेले नाही. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर प्रदोष काळ सुरू होत आहे. अशा काळात रात्री तुपाचे खूप सारे दिवे लावले तर महादेव प्रसन्न होतात. शिवाय तुपाच्या दिव्यांमुळे आजूबाजूचे सर्व किटाणूही मरून जातात. माझ्या हातात असते तर मी नक्कीच १०८ दिव्यांच्या माळेने घर उजळवून टाकले असते आणि माझी देशभक्ती दाखवून दिली असती’’, आत्येने वायफळ बडबड करीत आपले दु:ख व्यक्त केले.

    दिव्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते, पण तेवढयात आईने तिला गप्प राहण्याची खूण केली. ती बिचारी आत्येच्या प्रश्नांची उत्तरे न देताच निमूटपणे गप्प बसली.

    Marathi Story Two * आरती प्रियदर्शिनी

    ‘‘अहो ताई, हे घर तुमचे नाही का? तुम्ही तुम्हाला हवे तितके दिवे लावा. मी लगेचच सर्व सामान शोधून घेऊन येते,’’ आईच्या अशा समजूतदारपणाचा फायदा आत्ये वर्षानुवर्षे घेत आली आहे.

    आत्ये वडिलांची मोठी बहीण असून विधवा आहे. तिला दोन मुले असून दोघांनीही वेगवेगळया शहरात स्वतंत्रपणे संसार थाटला आहे. आत्ये कधी एकाकडे तर कधी दुसऱ्या मुलाकडे जाऊन राहते. पण तिचा तापट स्वभाव सहन करीत शांतपणे राहणे केवळ आईलाच जमते. म्हणूनच ती वर्षातील ६ महिने आमच्याकडेच राहते. तसे तर यामुळे कोणाला काही विशेष त्रास होत नाही, कारण आई सर्व सांभाळून घेते. पण, आत्येच्या जुन्या, बुरसटलेल्या विचारसरणीचा मला खूपच राग येतो.

    काही दिवसांपासून मला आईचाही खूप राग येत होता. आमच्या लग्नाला फक्त १५-२० दिवसच झाले होते. आत्येचे सतत घरात असणे आणि नोएडातील आमचा फ्लॅट छोटा असल्यामुळे मी आणि दिव्या मन भरून एकमेकांना भेटूही शकत नव्हतो.

    कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आमचे लग्न कसेबसे उरकले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्यामुळे हनिमूनची तिकिटेही रद्द करावी लागली. आत्येला गाझियाबदला जायचे होते, परंतु, कोरोना मातेच्या भीतीने तिने आधीच स्वत:ला घरात बंद करून घेतले होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आणि २५ मार्चला पंतप्रधानांनी लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर कोरोनासारख्या महामारीला हरविण्यासाठी आपण सर्व आपापल्या घरात कैद झालो. सोबतच कैद झाल्या त्या माझ्या आणि दिव्याच्या त्या कोमल, प्रेमळ भावना, ज्या लग्नापूर्वी आम्ही एकमेकांच्या डोळयात पहिल्या होत्या.

    दोन खोल्यांच्या छोटयाशा फ्लॅटमधील एक खोलीत आत्या आणि तिच्या अगणित देवांचा एकाधिकार होता. आईला तर ती नेहमीच स्वत:सोबत ठेवत असे. दुसरी खोली माझी आणि दिव्याची आहे. पण, आता मी आणि वडील या खोलीत झोपतो, तर दिव्या हॉलमध्ये, कारण वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते एकटे झोपू शकत नाहीत. आत्ये घरात असताना आई कधीच वडिलांसोबत झोपत नाही, कारण असे झाले तर आत्येची तिरस्काराने पाहणारी नजर जणू, तिला जाळून भस्म करून टाकेल. कदाचित हेच सर्व पाहून दिव्याही माझ्यापासून लांबच राहते, कारण आत्येची नजर सतत तिच्यावरही असते.

    ‘‘बाळा, जमल्यास बाजारातून मेणबत्त्या घेऊन ये,’’ आईचा आवाज ऐकताच मी माझ्या विचारचक्रातून बाहेर पडलो.

    ‘‘हे काय आई, तुही या सर्व गोष्टींमध्ये कशाला अडकतेस? दिवे लावून वेळ निभावून ने. सतत बाहेर जाणे चांगले नाही. नुकत्याच झालेल्या जनता कर्फ्यूवेळी टाळया, थाळया वाजवून मन भरले नाही का, ज्यामुळे आता दिवे आणि मेणबत्त्या लावणार आहात,’’ मी नाराजीच्या स्वरात आईला विचारले सोबतच बाजारात जाण्यासाठी मास्क आणि ग्लोव्हज घालू लागलो, कारण मला माहीत होते की आई ऐकणार नाही.

    कसेबसे कोरोना योद्धयांच्या दंडुक्यांपासून स्वत:ला वाचवत मेणबत्त्या आणि दिवे घेऊन आलो. हे सर्व लावण्यासाठी रात्री ९ वाजण्याची वाट पाहावी लागणार होती. परंतु, माझ्या डोक्यात तर त्याआधीच प्रकाश पडला. प्रेमाने आतूर झालेल्या मनाला शांत करणारी कल्पना सुचली. लगेचच मोबाईल काढला आणि व्हॉट्सअॅपवर दिव्याला मी केलेले नियोजन समजावून सांगितले, कारण आजकाल आमच्या दोघांमध्ये केवळ व्हॉट्सअॅपवरच गप्पा होत असत. ‘‘मी जसे सांगतो तसेच कर, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. पण हो, तू काही गडबड करू नकोस. तू माझी साथ दिलीस तरच ती ९ मिनिटे कायम आठवणीत राहतील.’’

    ‘‘बरं… मी पाहाते,’’ दिव्याच्या या उत्तरामुळे मला आंनद झाला आणि मी त्या ९ मिनिटांच्या नियोजनाबाबत विचार करू लागलो. रात्रीचे पावणे नऊ वाजताच आईने मला सांगितले की, घरातील विजेचे सर्व दिवे बंद कर. सर्वांनी बाल्कनीत या. मी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, हे सर्व तुम्हीच करा. मला ऑफिसचे खूप काम आहे. त्यामुळे मी येणार नाही.’’

    ‘‘यांना राहू द्या आई, चला मी येते,’’ आधीच ठरल्याप्रमाणे दिव्याने आईचा हात धरून तिला खोलीतून बाहेर नेले. आई आणि आत्येसोबत तिने २१ दिवे लावण्याची तयारी केली. आत्येचे असे म्हणणे होते की, २१ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी २१ दिवे उपयोगी पडतील.

    ‘‘आई, मी सर्व दिव्यांमध्ये तेल घातले आहे. मेणबत्ती आणि काडेपेटीही इकडेच ठेवली आहे. तुम्ही दिवे लावा, तोपर्यंत मी घरातले सर्व दिवे बंद करून येते.’’ दिव्याने पूर्वनियोजनानुसार सांगितले.

    घरात येऊन ती दिवे बंद करू लागली, त्याचवेळी मी दिव्याच्या कमरेत हात घालून तिला आमच्या खोलीत ओढले. दिव्यानेही तिच्या हातांची माळ माझ्या गळयात घातली.

    ‘‘अरे वा, तू तर आपले नियोजन पूर्णत्वास नेलेस.’’ मी दिव्याच्या कानात पुटपुटलो.

    ‘‘ते तर मी करणारच होते. तुझे प्रेम आणि सहवासासाठी मीही आतूर झाले होते.’’ दिव्याच्या या मादक आवाजामुळे माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या.

    ‘‘फक्त ९ मिनिटे आहेत आपल्याकडे…’’ दिव्या आणखी काही बोलण्याआधीच मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. प्रेमाची जी ठिणगी आमच्या दोघांच्याही मनात धगधगत होती तिने आता आगीचे रूप धारण केले होते. वाढलेल्या आमच्या श्वासांदरम्यान ९ मिनिटांची कधी १५ मिनिटे झाली, हे समजलेच नाही.

    जोरजोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून आम्ही भानावर आलो.

    ‘‘अरे बाळा, झोपलास का? जरा बाहेर ये… येऊन बघ दिवाळीसारखे वातावरण झाले आहे,’’ आईचा आवाज ऐकताच मी स्वत:ला सावरत दरवाजा उघडला. तोपर्यंत दिव्या बाथरूममध्ये गेली.

    ‘‘द… दिव्या इकडे आली नाही. ती तुमच्या सोबतच असेल,’’ मी गोंधळलेल्या स्वरात म्हणालो आणि आईचा हात पकडून बाहेर आलो.

    बाहेरचे वातावरण खरोखरच दिवाळीसारखे भासत होते. तेवढयात दिव्याही स्वत:ला सावरून बाल्कनीत आली.

    ‘‘तू कुठे गेली होतीस दिव्या? मी आणि आई तुला कधीपासून शोधत होतो,’’ मी लटक्या रागात विचारले.

    ‘‘मी गच्चीत गेले होते, दिव्यांचा हा उत्सव पाहण्यासाठी,’’ दिव्याने माझ्याकडे एकटक पाहात सांगितले. त्याचवेळी मी खोडकरपणे हसून, काळोखाचा फायदा घेत आणि आत्येपासून नजर चोरत हाताने दिव्याला फ्लाईंग किस केले.

    Marathi Story Three * इंजी आशा शर्मा

    ‘‘कशी आहेस पुन्नू?’’ मोबाईलवर आलेला एसएमएस वाचून पूर्णिमाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या.

    ‘मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल? अजय तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? शिवाय त्याला १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली असेल? आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीच संपले आहे,’ मनात आलेल्या विचारांना थांबवत पूर्णिमाने तो नंबर ट्रुकॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला. तो अजयच होता. पूर्णिमाने त्या एसएमएसला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला.

    Marathi Story Three * इंजी आशा शर्मा

    अजय तिचा भूतकाळ होता… महाविद्यालयीन दिवसांत त्यांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण त्याच्या प्रेमात एकाधिकारशाही अधिक होती. अजयचे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातील पूर्णिमाला स्वत:चा खूपच अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर मिळल्यामुळे तिला आभाळही ठेंगणे वाटू लागले होते. पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेडयांप्रमाणे वाटू लागले. त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकलेल्या पूर्णिमाचा श्वास कोंडू लागला.

    अजयला कुठलीही व्यक्ती पूर्णिमाच्या जवळ साधी उभी जरी राहिली तरी आवडत नसे. पूर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि पूर्णिमाने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. कित्येक दिवस अजय रुसून बसायचा.

    पूर्णिमा त्याच्या मागे-पुढे फिरायची. समजूत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची… मी तुझीच आहे असे शपथ घेऊन सांगायची… स्वत:ची काहीही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पूर्णिमा सुटकेचा नि:श्वास टाकायची. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा.

    महाविद्यालयात अनेक मित्र होते, बरेच कार्यक्रम व्हायचे. अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे. पण असे घडताच तो पूर्णिमाशी बोलणे बंद करायचा. मग काय, ती पुन्हा एकदा त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायची.

    हळूहळू पूर्णिमाच्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे भीतीने घर केले. इतर कुणाशीही बोलताना ती घाबरून जायची. तिचे सर्व लक्ष याकडेच असायचे की, अजय आपल्याला असे बोलताना पाहात तर नाही ना… जर अजयने बघितलेच तर मी काय उत्तर देऊ… त्याची समजूत कशी काढू… त्याला काहीही कारण सांगितले तरी त्याचे समाधान होणार नाही… माझ्या मनात इतर कुणाबद्दल काहीच नाही, याचा मी त्याला काय पुरावा देणार इत्यादी.

    अखेर महाविद्यालयातील शेवटचे वर्ष संपायला आले असताना तिने अजयसोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. तिला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की, तिच्या या निर्णयामुळे अजय खूपच दु:खी होईल. पण हेही नाकारता येत नव्हते की, जर यावेळी ती भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात तिच्या प्रेमाची नाव अजयच्या संशयी स्वभावाच्या वादळात अडकून बुडून जाईल. हे कोणाच्याच भल्याचे नसेल, अजयच्याही नाही आणि स्वत: पूर्णिमाच्याही नाही.

    पूर्णिमाने काळजावर दगड ठेवून तिच्या वडिलांच्या पसंतीचा मुलगा रवीशी लग्न केले. आता या जुन्या शहराशी तिचे नाते केवळ सुट्टीच्या दिवसांत माहेरी येण्यापुरतेच राहिले होते. अजयही नोकरीसाठी शहर सोडून गेला आहे, हे तिला तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींकडून समजले होते. मागील १० वर्षांत आयुष्य बदलून गेले. पूर्णिमा २ मुलांची आई झाली. खासगी महाविद्यालयात शिकवत होती. वेळ पंख लावून कधी उडून गेली हे, रवी, मुले आणि संसारात मग्न झालेल्या पूर्णिमाला समजलेदेखील नाही. पण आज अचानक अजयच्या आलेल्या या एसएमएसमुळे ती घाबरून गेली. काळाची जी तप्त राख आता थंड झाली आहे असे तिला वाटत होते त्यात अजूनही एखादी ठिणगी जळत होती. तिचा थोडासा बेजबाबदारपणाही या ठिणगीचा भडका उडवेल आणि आगीच्या या भडक्यात न जाणो कितीतरी जणांच्या आशा-अपेक्षा जळून खाक होतील, याची जाणीव पूर्णिमाला झाली.

    पुढील ३-४ दिवस अजयकडून कुठलाच एसएमएस आला नाही. तरीही पूर्णिमा अजयकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता, त्यामुळेच त्याच्या डोक्यात कटकारस्थान शिजत असल्याचे ती समजून गेली होती. अजय शांत बसणाऱ्यांपैकी मुळीच नव्हता.

    आज नेमके तेच घडले ज्याची पूर्णिमाला भीती होती. तासिका संपवून ती कॉमन रूममध्ये बसली होती आणि तेवढयातच तिचा मोबाईल वाजला. फोन अजयचा होता. तिने घाबरतच तो उचलला.

    ‘‘कशी आहेस पुन्ना?’’ अजयचा आवाज थरथरत होता.

    ‘‘माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही,’’ पूर्णिमाने अनोळखी असल्याप्रमाणे उत्तर दिले.

    ‘‘मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही… तू मला कशी विसरू शकतेस पुन्नू?’’ अजयने भावूक होत विचारले.

    पूर्णिमा काहीच बोलली नाही.

    ‘‘मी अजय बोलत आहे… १० वर्षे लोटली… पण एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तूझी आठवण आली नसेल… आणि तू मला विसरलीस? पण हो, एक गोष्ट नक्की… तू अजूनही तशीच दिसतेस… अगदी महाविद्यालयीन तरुणी… काय करणार? फेसबूकवर तुला बघून कशीबशी मनाची समजूत काढतो…’’

    अजय मनाला वाटेल तसे बोलत होता, दुसरीकडे पूर्णिमाला काय करावे तेच सूचत नव्हते. आपल्या सुखी भविष्यावर संकटाचे ढग आल्याचे तिला स्पष्ट दिसत होते.

    अजयचे फोन कॉल्स आणि एसएमएसची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अधूनमधून व्हॉट्सअपवरही मेसेज येऊ लागले. पूर्णिमा त्याला ब्लॉक करू शकत होती, पण तिला माहीत होते की, प्रेमभंग झाल्यामुळे जखमी झालेला प्रियकर सापासारखा असतो… त्यामुळेच ती कठोरपणे वागली तरी रागाच्या भरात अजय न जाणो कोणते पाऊल उचलेल जे तिच्यासाठी धोकादायक ठरेल, याची तिला भीती होती. पण हो, ती त्याच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देत नव्हती. स्वत:हून त्याला फोनही करत नव्हती. पण अजयचा फोन उचलत होती, जेणेकरून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार नाही.

    अजयच्या बोलण्याकडे ती विशेष लक्ष देत नव्हती. फक्त हा, हू म्हणत फोन कट करायची. अजयनेच बोलण्याच्या ओघात तिला सांगितले होते की, ज्या दिवशी पूर्णिमाचे लग्न झाले त्याच दिवशी त्याने झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २ वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता. त्यानंतर कसेबसे त्याने स्वत:ला सावरले. आईवडिलांच्या आग्रहामुळे विभाशी लग्न केले, पण पूर्णिमाला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता. विभा त्याची खूप काळजी घेत असे. आता तोही २ मुलांचा बाबा झाला होता, काही दिवसांपूर्वीच त्याची बदली या शहरात झाली इत्यादी…

    अजयचे या शहरात असणे पूर्णिमासाठी त्रासदायक ठरत होते. ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघायची तेव्हा अनेकदा एखाद्या रस्त्यावर आतूर प्रियकर बनून अजय उभा असल्याचे पाहायची. १-२ वेळा तिचा पाठलाग करत तो महाविद्यालयापर्यंत आला होता. ती सतत याच काळजीत होती की, अजयने काहीही चुकीचे वागू नये, ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल.

    ‘‘पुन्नू तुला २० एप्रिल आठवतोय?’’ आपली पहिली भेट… अजयने उत्साहाने पूर्णिमाला फोनवर विचारले.

    ‘‘आठवत तर नव्हता, पण आता तूच आठवण करून दिलीस,’’ पूर्णिमाने शांतपणे सांगितले.

    ‘‘ऐक २० एप्रिल जवळ येत आहे… मला तुला एकटीला भेटायचे आहे… कृपा करून नाही म्हणू नकोस… अजयने विनंतीच्या स्वरात सांगितले.

    ‘‘अजय, मला शक्य होणार नाही… हे शहर छोटे आहे… आपल्याला कोणी एकत्र पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल,’’ पूर्णिमाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

    ‘‘इथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे चल, पण नक्की भेट पुन्नू. तुझ्या मनात आले तर काहीच अशक्य नाही… जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या महाविद्यालयासमोर उभा राहीन,’’ अजय हट्ट सोडायला तयार नव्हता.

    ‘‘अजय, अजून २० एप्रिल यायला बराच वेळ आहे… मी आताच कुठलेही आश्वासन देऊ शकत नाही… शक्य झाल्यास बघू,’’ असे सांगून तिने विषय टाळला.

    पण अजय सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. तो दर दोन दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून २० एप्रिलला भेटण्यासाठी पूर्णिमावर मानसिक दबाव आणत होता.

    १५ एप्रिलला अचानक पूर्णिमाला महाविद्यालयीन प्रशासनाकडून सूचना सांगण्यात आले की, तिला एनसीसी कॅडेट्सला घेऊन प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे आहे. १९ ते २५ एप्रिलपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या शिबिरासाठी महाविद्यालयातील मुलींना घेऊन तिला १८ एप्रिलला दिल्लीला जायचे होते. अजयला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल पूर्णिमाने नियतीचे मनोमन आभार मानले आणि नंतर गाणे गुणगुणत दिल्लीला जायची तयारी करू लागली.

    ‘‘आपण भेटणार आहोत ना २० एप्रिलला?’’ अजयने १७ तारखेला तिला व्हॉट्सअप मेसेज केला.

    ‘‘मी २० तारखेला शहराबाहेर आहे,’’ पूर्णिमाने पहिल्यांदाच अजयच्या मेसेजला उत्तर दिले.

    ‘‘कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस… काहीही करून तुझे जाणे रद्द कर… फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक… त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही,’’ अजयने रडक्या इमोजीसह मेसेज पाठवला.

    यावेळी मात्र पूर्णिमाने कुठलेच उत्तर दिले नाही.

    ‘‘कुठे जाणार आहेस, एवढे तर सांगू शकतेस ना?’’ अजयने पुन्हा मेसेज केला.

    ‘‘दिल्ली.’’

    ‘‘मीही येऊ?’’ अजयने मेसेज करून विचारले.

    ‘‘तुझी मर्जी… या देशाच्या प्रत्येक नागरिकाला कुठेही येण्या-जाण्याचा अधिकार आहे,’’ असे टाईप करून त्याच्यासह दोन स्मायली टाकून तिने मेसेज केला.

    ‘‘तर मग २० एप्रिलला मीही दिल्लीला येत आहे,’’ अजयने लिहिले.

    पूर्णिमाला असे वाटले की, एकतर तो दिल्लीला येणार नाही आणि आला तरी चांगलेच होईल… कदाचित तिथे एकांतात त्याला सत्याचा आरसा दाखवून वर्तमानकाळात आणता येईल… वेडा, अजूनही १० वर्षांपूर्वीच्या काळात अडकला आहे.

    पूर्णिमा आपल्या ग्रुपसह १९ एप्रिलला सकाळी दिल्लीत पोहोचली. शिबिरात मुलींच्या राहण्याची व्यवस्था इतर ग्रुपच्या मुलींसोबत तर ग्रुपसोबत आलेल्या लीडर्सची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती. चहा-नाश्ता आणि जेवणासाठी एकच हॉल होता, जिथे नियोजित वेळेनुसार सर्वांना हजर राहायचे होते.

    नाश्ता झाल्यावर मुली शिबिरात रमल्या तर पूर्णिमा आपल्या खोलीत येऊन खाटेवर पहुडली. बऱ्याच वर्षांनंतर तिला असा निवांतपणा मिळाला होता. तिला झोप आली. ती उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहा पिण्यासाठी ती हॉलच्या दिशेने निघाली.

    तितक्यात तिचा फोन वाजला, ‘‘मी इकडे आलो आहे… तू दिल्लीत कुठे थांबली आहेस?’’

    ‘‘अजय, तुझे इकडे येणे शक्य नाही… तू उगाचच त्रास करून घेत आहेस,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला टाळण्याचा प्रयत्न केला.

    ‘‘मला तुझ्याकडे येणे शक्य नसेल, पण तू तर माझ्याकडे येऊ शकतेस ना… मी माझा पत्ता पाठवतोय… उद्या तुझी वाट पाहीन,’’ असे सांगून अजयने फोन कट केला. त्यानंतर थोडयाच वेळात पूर्णिमाच्या फोनवर अजयच्या हॉटेलचा पत्ता आला.

    २० तारखेच्या सकाळी जेव्हा मुली शिबिरात सराव करीत होत्या तेव्हा पूर्णिमा कॅब करून अजयने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली. रिसेप्शनला अजयच्या रूमबद्दल विचारले व त्याला मेसेज पाठवला. अजयने तिला रूमवरच बोलावले.

    दरवाजा उघडाच होता, पण आत खूपच अंधार होता. पूर्णिमाने आत पाऊल टाकताच सर्व लाईट एकदम सुरू झाल्या. अजय तिच्यासमोर लाल गुलाबांचा गुलदस्ता घेऊन उभा होता.

    ‘‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी,’’ असे म्हणत त्याने तिला फुले दिली.

    ती घ्यावीत की नाहीत, हेच पूर्णिमाला समजत नव्हते. तरीही शिष्टाचार म्हणून तिने ती घेतली व बाजूच्या टेबलवर ठेवून ती सोफ्यावर बसली. काही वेळ तेथे शांतता होती.

    ‘‘असे म्हणतात की, एखाद्यावर मनापासून प्रेम असेल तर संपूर्ण सृष्टीच तुमची आणि त्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागते,’’

    चित्रपटातील या संवादाची आठवण करून देत अजयने शांततेचा भंग केला.

    ‘‘अजय, तुला काय हवे आहे? स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस? जर वादळ उठले तर खूप काही नेस्तनाबूत होऊन जाईल,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

    ‘‘कृपा कर, आज कुठलाही उपदेश नको… कितीतरी प्रयत्नांनंतर तुला असे जवळून पाहता, बोलता येत आहे… मला याचा आनंद घेऊ दे,’’ अजय तिच्या खूपच जवळ गेला होता.

    त्याच्या अधीर झालेल्या श्वासांची जाणीव पूर्णिमाच्या गालांना झाली. त्यामुळे ती गोंधळून त्याच्यापासून थोडी दूर गेली.

    अजयच्या हे लक्षात आले. त्यामुळे तो दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला. मग जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले…

    अनेक जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या… कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पटलावर आले आणि निघून गेले… कधी दोघे मनमोकळेपणाने हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले… थोडयाच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले.

    २ वेळा कॉफी घेतल्यानंतर पूर्णिमा म्हणाली, ‘‘भूक लागली आहे… जेवणाची सोय करणार नाहीस का?’’

    ‘‘येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया?’’ अजयने विचारले. त्यानंतर पूर्णिमाच्या इच्छेनुसार त्याने रूममध्येच जेवण मागविले. जेवणानंतर पुन्हा गप्पा… गप्पा… आणि खूप साऱ्या गप्पा…

    ‘‘बरं अजय, आता मी निघते… तुला भेटून खूप छान वाटले. अशी आशा करते की, यापुढे तू माझ्यासाठी स्वत:ला त्रास करून घेणार नाहीस,’’ पूर्णिमाने घडयाळ बघितले. संध्याकाळ होत आली होती.

    ‘‘एकदा गळाभेट नाही घेणार?’’ अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. न जाणो काय होते त्याच्या डोळयात ज्यामुळे पूर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली.

    अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. त्यानंतर अलगद आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला. नंतर तिचे तोंड स्वत:कडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या प्रेमात पूर्णिमा विरघळत चालली होती. अजयने तिला उचलून बिछान्यावर आणले..

    तेवढयात तिचा मोबाईल वाजला आणि पूर्णिमा जणू झोपेतून जागी झाली. अजयने पुन्हा तिला स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आता पूर्णिमा भानावर आली होती. तिने फोन उचलला. तो रवीचा होता. पूर्णिमा आपल्या आतूर श्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती येथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले.

    ‘‘अजय, मी तुझा हट्ट पूर्ण केला. आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, माझे म्हणणे ऐकशील ना?’’ पूर्णिमाने अजयचा हात स्वत:च्या हातात घेत त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली.

    जवळपास २ महिने झाले… अजयने एकही फोन, मेसेज न केल्याने पूर्णिमा निश्चिंत झाली होती. पण तिचा हा आंनद जास्त दिवस टिकू शकला नाही. अजय पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला. कधी पूर्णिमाच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभा राहायचा तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर… कधी एसएमएस करायचा तर कधी व्हॉटट्सअप मेसेज… आता पूर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती. पण हो, या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. तरीही ती मनातल्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती, कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत. अशा वेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल, याची तिला भीती होती.

    काहीतरी करावेच लागेल… पण काय? रवीला सर्व सत्य सांगू का? नाही नाही, पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कुणी तिच्यावर प्रेम करीत आहे, हे त्याला कसे सहन होणार… तर मग काय करू? अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का? नको, असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही… तर मग नेमके करू तरी काय? पूर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची.

    पुढच्या महिन्यात पूर्णिमाचा वाढदिवस होता. अजय पुन्हा एकदा शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला. पूर्णिमा त्याच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नव्हती. मात्र अजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. कधीकधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की, पूर्णिमाच्या मनात असो किंवा नसो… तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच.

    ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली. ते अजयच्या एका सहकर्मचाऱ्याचे घर होते, जे तो भाडयाने द्यायचा. मात्र भाडेकरू न मिळाल्यामुळे सध्या घर रिकामेच होते. अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाडयाने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती.

    जसे पूर्णिमाला वाटत होते त्याचप्रमाणे अजयने केक, फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती. टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती. पूर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

    आज ती पूर्णपणे सावध होती. भावनात्मक रुपात तिच्यावर वर्चस्व गाजविण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही. काहीवेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पूर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला. त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाने मात्र प्रतिसाद दिला नाही.

    थोडया वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. ‘‘विभा तुझ्यावर खूप प्रेम करते ना अजय?’’

    ‘‘हो, करते,’’ अजयच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले.

    ‘‘कधी तू तिला विचारले आहेस का की, लग्नापूर्वी तिचे कोणा दुसऱ्यावर प्रेम होते का ते?’’ पूर्णिमाने विचारले.

    ‘‘नाही… नाही विचारले आणि मला ते माहिती करून घ्यायचे नाही, कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो,’’ अजयने अगदी शांत स्वरात उत्तर दिले.

    ‘‘जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असेल तर?’’ पूर्णिमाने रागाची ठिणगी उडवणारा प्रश्न विचारला.

    ‘‘नाही, विभा चरित्रहीन असूच शकत नाही… ती माझ्याशी कधीच बेईमानी करू शकत नाही,’’ अजय रागाने लालबुंद झाला होता.

    ‘‘अरे वा अजय, जर विभाने तिचा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडलेस तर ते प्रेम… कशी दुहेरी मानसिकता आहे ना… मानली तुझी विचारसरणी,’’ पूर्णिमा उपहासाने म्हणाली.

    अजयला काय उत्तर द्यावे तेच सुचले नाही. तो विचारात पडला.

    ‘‘अजय, जसा विचार तू करतोस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबाबत करीत असतो… कदाचित रवीही… त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटतेय का?’’ पूर्णिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

    ‘‘नाही, कधीच नाही. मला माफ कर पुन्नू… तुला गमाविणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ते यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो… हे विसरून गेलो होतो की, माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे,’’ अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता.

    ‘‘हो ना, जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असशील तर तुला त्या प्रेमाची शपथ… यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस… या नात्याला आता येथेच पूर्णविराम दे,’’ पूर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयच्या समोर ठेवला. अजयने तो घट्ट पकडला.

    पूर्णिमाने शेवटचे अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यानंतर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाजाच्या दिशेने पुढे गेली.

    Marathi Story Four * रमा अवस्थी

    संध्याकाळ होत आली होती. पर्वताच्या मार्गावर संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. शैलेन गाडीत बसून विचार करीत होता की, कुठे मुंबईतील गर्दी आणि कुठे ही डोंगरांमधील शुद्ध हवा. आज कितीतरी वर्षांनंतर तो आपल्या घरी आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला होता. त्याचे घर कुर्ग येथे होते. कुर्ग निसर्ग सौंदर्य आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बहीण इरा, जी त्याची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती ती अमेरिकेहून आली होती. जास्त करून त्याचे आईवडिल त्याच्यासोबत मुंबईत राहत, कारण आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या शैलेनकडे वेळ नव्हता. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. परंतु यावेळी इरा आली होती आणि तिला यावेळेस आपला वेळ कुर्गमध्ये घालवायचा होता. तिला भेटण्यासाठी आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शैलेन ३ दिवसांसाठी आपल्या घरी निघाला होता. मायसोरच्या पुढे असलेली तांदळाची शेती आणि स्वच्छ, सुंदर गावांना मागे टाकत त्याची गाडी पुढे निघाली होती. त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नयनरम्य होता.

    सहजच शैलेनला आठवण झाली की, इराला तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटून त्यांच्यासह शाळेत जाण्याची इच्छा आहे. यावेळेस तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती. इरा आणि तिच्या सर्व मैत्रिणी एकाच शाळेत शिकल्या होत्या. त्यांना पुन्हा एकत्र मिळून शाळेत जायचे होते आणि खूप वर्षांनंतर अखेर ती संधी मिळाली होती.

    Marathi Story Four * रमा अवस्थी

    ‘‘मला, बरेच झाले,’’ शैलेनने मनातल्या मनात विचार केला. तोही त्याच शाळेत शिकला होता. इरा आणि तिच्या मैत्रिणींपेक्षा तो ३ वर्षांनी मोठा होता. भाऊबहीण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी तर होतेच, पण सोबतच सर्व गुपिते एकमेकांना सांगत असत. एकमेकांची रहस्ये सर्वांपासून लपवून ठेवत. याची आठवण होताच शैलेनला हसू आले. त्याला इराच्या मैत्रिणी आठवल्या. त्या सर्व इराप्रमाणेच खोडकर होत्या. अनेकदा तो इराच्या मैत्रिणींना सोडायला त्यांच्या घरी जात असे. त्याने इराच्या बऱ्याच मैत्रीणींना सायकल चालवायला शिकविली होती.

    या वेळेस तो इराला विचारणार होता की, तिच्या सर्व खोडकर मैत्रिणी कुठे आहेत व कशा आहेत? तसे तर फेसबूक आणि व्हॉट्सअपमुळे सर्व एकमेकांच्या संपर्कात होत्या. शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे आठवू लागले. हे चेहरे आणि नावे त्याच्या आयुष्यासाठी विशेष महत्त्वाची नव्हती, पण या सर्वांसोबत त्याच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. शैलेनला आठवले की, जेव्हा त्याचे लग्न मुंबईत होणार, असे पक्के झाले होते तेव्हा इराच्या सर्व मैत्रिणी खूपच निराश झाल्या होत्या. त्या सर्वांना त्याच्या लग्नात सहभागी व्हायचे होते, कारण त्यांच्यासाठी भरपूर मजा करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नव्हती. नंतर जेव्हा रिसेप्शन कुर्गमध्ये होणार, असे ठरले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला.

    गाडी कॉफीच्या बागांमधून पुढे चालली होती आणि शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आठवू लागली होती. या चेहऱ्यांमधील एक वेगळा चेहराही होता ज्याची आठवण होताच शैलेनचा जीवनातील उत्साह अधिकच वाढल्यासारखे वाटायचे. तो चेहरा वेदाचा होता. वेदा ही इराच्या खास मैत्रिणींपैकी एक होती. वेदात असे वैशिष्ट्य होते की, ती तिच्या चेहऱ्यावरील खोडकरपणाला निरागसतेत सहज बदलू शकत होती. तसा तर शैलेन इराच्या सर्व मैत्रिणींना भेटत असे. पण एका रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले की, त्यानंतर त्याला वेदाला भेटताना अवघडल्यासारखे वाटू लागले होते.

    शैलेन वेदाला शेवटचे भेटला त्या गोष्टीलाही आता १६ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ती शैलेनच्या रिसेप्शनलाही येऊ शकली नव्हती. त्या रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले होते की, जे आजही शैलेनला जगण्याची प्रेरणा देत असे. तसे तर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी जे काही हवे ते सर्व त्याच्याकडे होते, पण तरीही रविवारची ती संध्याकाळ नसती तर सर्व अधुरे राहिले असते. १६ वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेस चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र लिहिली जायची. त्या रविवारच्या संध्याकाळी अशीच एक चिठ्ठी शैलेनला मिळाली होती. त्या चिठ्ठीत त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक मदतीसाठी (सायकल शिकविणे, गृहपाठासाठी मदत करणे इत्यादी) धन्यवाद देण्यासह शेवटी असे लिहिले होते की, शैलेनने त्या रात्री ८ वाजता फोनची वाट पाहा. पत्राच्या शेवटी वेदाचे नाव लिहिले होते.

    शैलेन ती चिठ्ठी हातात घेऊन तिथेच बसून राहिला. तसे तर त्या चिठ्ठीत त्याच्यावर प्रेम असल्याबाबत कुठलाच उल्लेख उघडपणे केलेला नव्हता, पण चिठ्ठी लिहिणारी मुलगी वेदाच होती, हे स्पष्ट झाले होते. तिला तो आवडत असे. पहिल्या आणि कदाचित शेवटच्या वेळेस असे घडले होते की, एखाद्या मुलीने त्याचे कौतुक केले होते. महानगरांमध्ये आणि त्याच्या परदेशातील प्रवासात अनेक महिला मैत्रिणींनी आणि महिला सहकर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते, पण त्या सर्वंमध्ये नाटकीपणा जास्त होता. ही चिठ्ठी आणि त्यातील भावना शैलेनला दवबिंदूच्या थेंबाप्रमाणे सुखावह वाटत असे.

    त्या काळात भावनांमध्ये खरेपणाची ऊब होती, आजच्याप्रमाणे त्या वरवरच्या, थंड नव्हत्या. आजही ती चिठ्ठी शैलेनने जपून ठेवली होती. जेव्हा कधी शैलेनला ती चिठ्ठी आणि त्यात लिहिलेले शब्द आठवायचे तेव्हा त्याचा थकवा बऱ्याच अंशी निघून जायचा.

    तो त्या रविवारच्या संध्याकाळी फोनची वाट पाहत होता. पण वेदाने ८ वाजताची चुकीची वेळ निवडली होती. रविवारच्या रात्री शैलेनचे वडील सर्वांसोबत जेवत आणि फोनही त्याच खोलीत होता. वेदा फोन करण्यासाठी वेगळा एखादा दिवस निवडू शकत होती.

    शैलेन रात्रीचे ८ वाजण्याची वाट पाहात होता. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे फोन आला आणि तोही ८ वाजताच. फोन वडिलांनी घेतला. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तेच फोन घ्यायचे. पण फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही. पुढचे काही दिवस शैलेनने वेदाचा विचार करण्यात घालवले. त्यानंतर तो वेदाला भेटला, पण तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की, तो तिला चिठ्ठीबाबत विचारू शकला असता. त्यानंतर हळूळू सर्व आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

    शैलेन मुंबईला आला. इरा अमेरिकेला आणि वेदा बंगळुरुला गेली. त्यानंतर असे ऐकायला मिळाले होते की, वेदाचे लग्न बंगळुरुलाच झाले होते. पण शैलेन ती चिठ्ठी विसरू शकला नाही. आजही रविवरचीच संध्याकाळ होती आणि शैलेन आपल्या घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता. आता त्याची गाडी वळणदार रस्यावरून घराच्या दिशेने निघाली होती. अचानक मोबाईल वाजला. इराने फोन केला होता.

    ‘‘आणखी किती वेळ लागेल?’’ इराने उतावीळपणे विचारले.

    ‘‘बस आणखी अर्धा तास… कॉफी तयार ठेव… मी पोहोचतोच आहे,’’ शैलेनने उत्तर दिले.

    तेवढयात इराने विचारले, ‘‘ओळख कोण आहे माझ्यासोबत?’’

    तिने अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे शैलेन गोंधळला. कोण असेल बरं?

    तितक्यात इरा म्हणाली, ‘‘अरे माझी सर्वात प्रिय मैत्रीण वेदा.’’

    शैलेनचे हृदय धडधडू लागले. त्याला पुन्हा एकदा ती चिठ्ठी आणि रविवारची संध्याकाळ आठवली. तो स्वत:शीच हसला. वेदा आली होती, या गोष्टीचा त्याला आनंद झाला. संध्याकाळ गडद होत चालली होती. शैलेन घरी पोहोचला. तेथे पोहोचताच आईवडिलांच्या पाया पडला.

    तेवढयात मागून आवाज आला, ‘‘हॅलो, कसा आहेस?’’

    शैलेनने मागे वळून पाहिले असता वेदा समोर उभी होती.

    ‘‘हॅलो वेदा, कशी आहेस?’’

    शैलेनने तिच्याकडे पाहात हसत विचारले.

    ‘‘मजेत,’’ वेदाने उत्तर दिले.

    शैलेनने पाहिले की, वेदात फारसा बदल झाला नव्हता. तेच डोळे, तसाच चेहरा, तोच निरागसपणा आणि या सर्वांमागे तोच खोडकर स्वभाव. काही औपचारिक गोष्टी आणि एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केली. शैलेन मनोमन विचार करू लागला की, वेदा रविवारची ती संध्याकाळ विसरली असेल का? तसे पाहायला गेल्यास आठवणीत ठेवण्यासारखे होते तरी काय? एका चिठ्ठीचा विसर पडणे सोपे होते. पण शेवटी काहीही झाले तरी ती चिठ्ठी वेदाने स्वत:च्या हाताने लिहिली होती. स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीला ती कशी काय विसरली? तसेही आजच्या फेसबूकच्या युगात एका छोटयाशा चिठ्ठीचे महत्त्व तरी कितीसे असणार? पण त्या काळात चिठ्ठीमुळेच दोन हृदये जोडली जात होती.

    त्या चिठ्ठीने शैलेनला एक जाणीव करून दिली होती. कोणाला तरी आपण आवडत असल्याची सुखद जाणीव.

    ही जाणीव जीवनात अत्यावश्यक असलेल्या हवा आणि पाण्याइतकी महत्त्वाची नसली तरी तिचे असणे जीवन आणखी सुंदर बनविते. पण आश्चर्य म्हणजे वेदाला हे काहीच आठवत नव्हते. वेदा आणि शैलेन, दोघेही आपापल्या आयुष्यात गर्क होते, हे खरे असले तरी भूतकाळात जगलेल्या काही क्षणांची आठवण नव्याने जागी करायला काहीच हरकत नव्हती. म्हणूनच वेदाने ज्या भावना एके दिवशी पत्राच्या रुपात शब्दबद्ध केल्या होत्या त्या भावना शैलेनच्या नसतानाही त्याला आठवत होत्या, पण असे वाटत होते की, वेदा विसरून गेली होती.

    शैलेनला या सर्वांची जाणीव होताच अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. रात्रीचे १० वाजले होते. तो बाल्कनीत बसला होता. तेवढयात इरा कॉफी घेऊन आली. शैलेन तसे तर इरापासून काहीच लपवित नसे, पण न जाणो कोणता विचार करून वेदाच्या चिठ्ठीबाबत त्याने इराला काहीच सांगितले नव्हते. आज अनेक वर्षांनंतर शैलेनला असे वाटू लागले की, वेदाच्या चिठ्ठीबद्दल इराला सांगायला हवे. इरा तेथेच बसून कॉफी पीत होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहात होती.

    ‘‘वेदा कुठे कामाला जाते का?’’ शैलेनने विषयाला हात घातला.

    ‘‘हो’’, मोघम उत्तर देऊन इरा पुन्हा मोबाईल पाहू लागली.

    ‘‘कुठे?’’ शैलेनने विचारले.

    ‘‘तिचे बंगळुरूमध्ये एनजीओ आहे.’’ इराचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते.

    शैलेन पुढे बोलण्यासाठी उगाचच गळा खाकरत म्हणाला, ‘‘तुला माहीत आहे का, वेदाने मला एक चिठ्ठी लिहिली होती. खूप आधी, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिकत होता. मी त्या चिठ्ठीला कोणतेच उत्तर दिले नव्हते.’’

    आता मात्र इराने मोबाईल बाजूला सारत भावाकडे पाहिले. ‘‘कोणती चिठ्ठी, तीच का, जी छोटूच्या हातून पाठविण्यात आली होती?’’ इराने हसून विचारले.

    ‘‘हो, हो, तीच… तुला माहीत आहे का?’’ शैलेनला इराने त्या चिठ्ठीचा विषय हसण्यावारी घेतल्याचा राग आला होता. तो सोडून त्या चिठ्ठीशी जोडले गेलेले इतर सर्वच ही गोष्ट एवढी हसण्यावारी का घेत होते?

    ‘‘ती चिठ्ठी वेदाने लिहिली नव्हती. मधू आणि चंदाने लिहिली होती,’’ इराने जांभई देत सांगितले.

    ‘‘याचा अर्थ काय? मधू आणि चंदाने लिहिली होती, कशासाठी?’’ शैलेनने विचारले. मधू आणि चंदाही इराच्या मैत्रिणी होत्या आणि त्याही खूपच खोडकर होत्या.

    शैलेनने विचारलेला प्रश्न ऐकून इरा हसू लागली. ‘‘अरे भावा, तू विसरून गेलास का? तो दिवस एप्रिल फूलचा होता.’’

    मधू आणि चंदाचा चेहरा शैलेनच्या डोळयांसमोर आला.

    ‘‘पण चिठ्ठीखाली नाव वेदाचे होते.’’ शैलेनने सांगितले.

    ‘‘आता कोणाचे तरी नाव लिहावेच लागणार होते, त्यामुळे वेदाचे नाव लिहिले,’’ इराने उत्तर दिले.

    ‘‘वेदाला ही गोष्ट माहिती होती का?’’ शैलेनने आश्चर्यचकित होत विचारले.

    ‘‘कोणती गोष्ट? चिठ्ठीची का? सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण नंतर त्यांनी मला आणि वेदाला सांगितले होते की, त्यांनी १ एप्रिल असल्याने तुला वेदाच्या नावाने मूर्ख बनवले होते,’’ इराने आळसावत सांगितले.

    ‘‘पण त्यांनी वेदाचे नाव लिहायला नको होते,’’ शैलेन पुटपुटला.

    ‘‘हो, लिहायला तर नको होते, पण त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांना माहीत होते की, तू एक सज्जन मुलगा आहेस,’’ डोळयांवर प्रचंड झोप असतानाही इराने उत्तर दिले.

    शैलेन मनोनम हसत असा विचार करू लागला की, तो १ एप्रिल संपूर्ण १६ वर्षे साजरा झाला, असे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. पण काही का असेना, भलेही तो त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न असला तरी त्या घटनेने त्याच्या जीवनातील आनंदात भर घातली होती. अजाणतेपणी का होईना, पण त्या मुलींनी असे काही केले होते ज्यामुळे शैलेनच्या जीवनातील आनंद वाढला होता.

    Marathi Story Five * सोनाली बढे

    सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला, तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली अन् मनात काहीतरी खळ्ळकन् फुटलं. आज नऊ जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज एक वर्ष पूर्ण झालं होतं.

    जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला एक वर्ष झालं. जुई त्याची पत्नी. म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायेदशीर दृष्टीनं ती दोघं पतीपत्नी होती. पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईनंदेखील कायेदशीर घटस्फोट घेतला नव्हता.

    मनात घोंघावणाऱ्या वादळानं आता राघव पार अवस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप अन् मोबाइल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. काम करणाऱ्या शांती मोलकरणीला ‘एक कप कॉफी कर’ असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकीट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात ‘राघव’ असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं.

    Marathi Story Five * सोनाली बढे

    ‘‘राघव या कोऱ्या कागदांवर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापताहेत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीए. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटतं. काल मला पुन्हा तेच भीतिदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्यातरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते अन् बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत, खुनशी हास्य उमटतं.

    बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला, किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजातच मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतिदायक…चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर दोन शिंग, तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा ‘तू तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्नं मला पुन्हा:पुन्हा पडत होतं.

    आता विचार करते तेव्हा लक्षात येतं की किती छोटीशी गोष्ट होती. माझं वजन एकदम वाढलं होतं. खरंतर मनातली असुरक्षितपणाच्या भावनेनंच मला थायराइडचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. वरवर बघता गोष्ट साधी होती. आईसबर्गवरवर बघताना केवढासा दिसतो. त्याचा पाण्याखालचा भाग मात्र खूपच मोठा अन् अदृश्य असतो. म्हणूनच मोठाली जहाजं त्याच्यावर आपटून फुटतात. त्या न दिसणाऱ्या कामासारखंच माझं झालं होतं. मनातही भीती, आधाराचा अभाव यामुळे मी सैरभैर असायची.

    वाचतावाचता राघवचे डोळे भरून आले. त्याला आठवलं, तो हल्ली किती संतापी झाला होता. बारीक सारीक गोष्टींवरून संतापायचा. सगळा राग जुईवर काढायचा, हेच त्याचं रूटीन झालं होतं. सुरूवातीला असं नव्हतं. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखी होतं. हळूहळू कामाचा त्याग, नोकरीतली जीवघेणी स्पर्धा यामुळे तो खूप बदलला, सगळं फ्रस्टे्रशन मग जुईवर काढायचा.

    खरंतर पुढे वाचायचं धाडस होत नव्हतं राघवला. पण ते वाचायलाच हवं, तिच त्याची शिक्षा होती. त्यानं वाचायला सुरूवात केली.

    ‘‘आठ महिन्यांपूर्वी केलेल्या ब्लडटेस्टमध्ये मला हायपोथायरॉईडिझम आहे हे लक्षात आलं. त्यामुळे वजन एकदम वाढतं. त्यात माझा काय दोष होता?’’

    ‘‘जाडी, ढप्पी, म्हैस कुठली…’’ तू ओरडायचा, ‘‘लठ्ठ, मठ्ठ, जाडी’’, ‘‘कुरूप, बेढब, बोदी’’ तू मला हेच सतत ऐकवायचास…कदाचित अगदी पहिल्यापासूनच मी तुला आवडत नसेन. वाढलेलं वजन हे एक कारण किंवा निमित्त मिळालं होतं तुला. लोकांना माझा हसरा चेहरा आणि खळखळून हसणं आवडायचं. पण तुला तेही नकोसं वाटायचं. खरंय, एखादं माणूस आवडेनासं झालं की त्याचं काहीच मग आपल्याला आवडत नाही. आपल्याला त्याचा रागच राग येतो.

    ‘‘जर तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर माझ्या वाढलेल्या वजनामुळे तू असा तिरस्कार केला नसता. किमान तू संवेदनशील असावं असं मला वाटायचं. पण तू तर सतत मला टोमणे मारायचास, शोधून शोधून, उकरून उकरून माझे दोष काढायचास. लोकांपुढे माझा अपमान करायचास, माझ्या किती तरी सवयी मी तुझ्यासाठी बदलल्या .पण तू तर अजिबात बदलला नाहीस. दारू पिणं, सिगारेट ओढणं, उशिरापर्यंत दिवा लावून काम करत बसणं, मित्र जमवून पत्ते कुटत बसणं, यातलं काय सोडलंस तू? मी मात्र तुझी प्रत्येक आवडनिवड जपली. तुला जे आवडतं, तेच मी करत होते. तुला आवडणारं शिजवत होते, तुला आवडणारे खात होते, तुला आवडणारेच कपडे, रंग वापरत होते, तुला आवडेल तेच बोलत होते, तेवढेच ऐकत होते. मला माझं अस्तित्त्वच उरलं नव्हतं. मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वत:चं असं काही उरलंच नव्हतं. माझी स्वत:ची ओळखच उरली नव्हती.’’

    राघवच्या डोक्यात जणू कुणी घणाचा घाव घातला होता. पण ते दु:ख आज तो सहन करणार होता. जुईला त्याच्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या दु:खाचा तेवढाच एक उतारा होता. जुईचं हरवलेलं अस्तित्त्व पुन्हा मिळवून द्यायला हवं. तो पुढे वाचू लागला.

    ‘‘तू घातलेले पसारे मी आवरायची, तुझे मळवून आणलेले कपडे मी धुवायची, केर काढायची, लादी पुसायची, बाथरूम-टॉयलेट स्वच्छ करायची, स्वयंपाक मी करायची, बाजारहाट, निवडणं, चिरणं, भाजणं सगळं सगळं मी करत होते. तू फक्त ऑफिसात जाऊन यायचा की, ‘दमलो’ म्हणून सोफ्यावर बसायचा, आवडीचे टीव्ही प्रोग्रॉम बघायचास, एक ग्लास पाणी कधी हातानं घेऊन प्यायला नाहीस, इतर कामाचं काय सांगायचं? पण तू थकत होतास अन् मी मात्र तुला ताजी, टवटवीत हवी असायची. तक्रारी फक्त तूच करणार, टोमणे फक्त तूच देणार कारण वाईट मी होते. दोष माझ्यात होते.

    ‘‘तू तर जणू देवदूत होतास. तुझ्यात फक्त गुण होते. माझ्या अपेक्षा काही फार नव्हत्या. बायकोला नवऱ्याकडून थोडं कौतुक, थोडं प्रेम हवं असतं, तेवढंही तू मला देत नव्हतास. घरकामात मदत कुठून करणार होतास? मुळात मी तुला आवडतच नव्हते. मी फक्त काम करणारं मशीन होते अन् रात्री तुला सुखवणारी दासी.

    ‘‘अंथरूण अन् स्वयंपाकघर या पलीकडेसुद्धा एक स्त्री असते, ही तुझ्या समजूतीपलीकडची गोष्ट होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वजनामुळे मी त्रस्त असतानाही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुला खटकत होतं, सहन होत नव्हतं. तू किती चिडायचास? का? मला येणारा थकवा, मानसिक ताण दूर करण्यासाठी मी हसत होते तर चिडत का होतास तू? तुझ्या संगतीतले ते त्रस्त दिवस अन् झोपेवाचून घालवलेल्या असंख्य रात्रीचं काय? तुला वाटायचं, मी आपल्या वजनामुळे लज्जित व्हावं, का म्हणून? माझा दोष थोडीच होता तो? लज्जित तू व्हायला हवंय. तुझ्यामुळे मला त्रास झालाय.

    ‘‘राघव, तुला ठाऊक आहे, तुला टक्कल पडायला लागलंय. तुझ्या चेहऱ्यावर एक ओंगळ मसा आलाय, पण मी तर कधीही म्हटलं नाही की त्यामुळे तू वाईट दिसतोस? खरं तर माझं वाढलेलं वजन हे एक निमित्त मिळालं होतं तुला. तुझा राग काढायला, माझा अपमान करायला ते एक निमित्त होतं. आता माझा थायरॉइड आटोक्यात आलाय. नियमित औषधोपचार, व्यायाम, प्राणायम करून मी आता वजन बऱ्यापैकी कमी केलंय. तरीही तू कधी एका शब्दानं मला म्हटलं नाहीस, मी खूप आशेनं तुझ्याकडे बघायची, माझ्यात झालेला बदल तुला जाणवतोय का हे मला बघायचं होतं. पण नाही…राघव, घृणेचा, तिरस्काराचा वटवृक्ष वाढतो, पसरतो तशी याची मुळंही खोलवर जातात. मलाच स्वत:चं नवल वाटतं की इतकी वर्षं मी का अन् कशी काढली तुझ्याबरोबर? सतत स्वत:चं मन मारायचं, इच्छा मारायच्या, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व, स्वत:ची ओळखही विसरायची…सोपं नव्हतं!

    ‘‘पण आता बस्स झालं! खूप झालं! तुझ्याकडून मार खाणं, तुझ्याकडून घाणेरडं बोलणं ऐकणं, स्वत:चा अपमान सहन करणं आता मला मान्य नाही. माझा रोग शारीरिक होता. पण तू मानसिक रूग्ण आहेस. तुझ्यासारख्या मनाच्या रोग्याबरोबर राहून मला रोगी व्हायचं नाहीए. हा जन्म एकदाच लाभतो. हे आयुष्य भरभरून जगायचंय मला. मी आज स्वत:ला तुझ्या बंधनातून मुक्त करते आहे. मला मोकळ्या मनानं जगायला आवडतं, खळखळून हसायला, प्रसन्न चेहऱ्याने वावरायला आवडतं. माझ्या वाढलेल्या वजनासकट ज्यांनी मला प्रेमानं स्वाकीरलं, ती माणसं मला आवडतात. माझ्याशी प्रेमाने बोलणारी, मला सन्मानानं वागवणारी माणसं मला आवडतात. पण तू त्यातला नाहीस. प्रेम कधी केलंच नाहीस माझ्यावर.

    थरथरणाऱ्या हातात ते पत्रही थरथरत होतं. राघव सुन्न बसून होता. या एक वर्षांनं त्याला खूप काही शिकवलं होतं. बायको फक्त शोपीस नसते. ती आयुष्यातली मौल्यवान मिळकत असते. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. या वर्षभरात अनेक मुली त्याच्या आयुष्यात आल्या. कुणाला त्याचा भरपूर पगार दिसत होता तर कुणाला उच्च पद, पण प्रत्येकीनं स्वत:चे नखरे दाखवले. एकदा सॅली डिसुझाबरोबर जेवण घेत असताना त्याचा फोन वाजला. तो पाचच मिनिटे फोनवर बोलत होता, तेवढ्यात संतापून ती जेवण टाकून निघून गेली. जुईनं कधीच असा त्रागा केला नव्हता. एकदा रात्री झोपायला पिंकी ग्रेवाल त्याच्यासोबत हॉटेलात गेली अन् त्याच्या सिगरेटच्या वासानं भडकून तिथं एकटाच सोडून निघून गेली. जुईनं तक्रारीचा चकार शब्द कधी काढला नव्हता. कधीही घरात, अंथरूणात किंवा एरवीही तिच्या काहीच मागण्या नव्हत्या.

    गेल्या वर्षभरात बरेचदा त्यानं ठरवलं होतं की जुईला फोन करूयात. आपल्या वागणुकीबद्दल क्षमा मागूयात…पण ते जमलं नव्हतं. पण आता मात्र तो अजिबात थांबणार नाहीए. तो आत्ताच तिच्याकडे जाणार आहे अन् तिची क्षमा मागणार आहे. तिच्या मोठेपणाची त्याला जाणीव आहे. तिच्या कष्टांची त्याला जाणीव आहे. तिनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. तो तिच्या ऋणात आहे. एवढंच नाही तर तो हे ही सांगणार आहे की तिचं हसणं त्याला खूप आवडतं. तिच्या हायपोथायरॉइडची तो काळजी घेईल. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. ती जशी आहे, तशीच त्याला खूप खूप आवडते.

  • ताज्या पोस्ट